Type Here to Get Search Results !

नवी मुंबईतील सिडकोचे प्रकल्प गेम चेंजर - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे


रु.5 हजार कोटी मूल्य असलेल्या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन व उद्घाटन

 

ठाणे,  :- नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहात असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी काढले.


सिडकोतर्फे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमीपूजन त्याचप्रमाणे भूमीपुत्र भवन, आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी हिताच्या प्रकल्पांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या विकास प्रकल्पांचे एकूण मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे.


यावेळी पालकमंत्री श्री.शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार श्री.रमेश पाटील, श्री.गणेश नाईक, श्री.प्रशांत ठाकूर,  श्री.महेश बालदी, श्रीमती मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सिडको चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री.शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप ढोले आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना  मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकासकामे होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारी विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) ही राज्याकरिता अश्वशक्ती आहे. महाराष्ट्र शासनाने अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.  


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. विजय सिंघल यांनी सिडकोच्या उद्घाटन व भूमीपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासदेखील थेट जोडणी मिळणार आहे. खारघर-तुर्भे जोड मार्ग हा 5.4 कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.  उलवे येथील भूमीपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमीपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याचबरोबर या भवनाच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांचे विविध सोहळे व कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काची जागा प्राप्त होणार आहे.  उलवे किनारी मार्ग हा अटल सेतू (एमटीएचएल) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येत आहे.  नेरूळ येथे प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आले असून येथून नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण यादरम्यान रो-रो आणि स्पीड बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय नेरूळ, नवी मुंबई येथून मुंबई (भाऊचा धक्का) Domestic Cruise Terminus (DCT) तसेच एलिफंटा गुंफा, मांडवा, रेवस इत्यादी ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे या प्रदेशांदरम्यान प्रवासाचे अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. तसेच पर्यटकांनाही या ठिकाणाला भेट देऊन रम्य सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे, अशी माहिती उपस्थितांना दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies