ठाणे :- जिल्हा नियोजन समितीचा 100 टक्के निधी खर्च करुन पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दिले.
यावेळी आमदार सर्वश्री किसन कथोरे, शांताराम मोरे, नरेंद्र मेहता, महेश चौगुले, रईस शेख, निरंजन डावखरे, सुलभा गायकवाड, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या दि.26 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजूरी देवून अनुपालन अहवाल मान्य केला. सन 2025-26 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेचा मंजूर नियतव्ययाचा आढावा घेवून 31 मार्च 2026 च्या अगोदर 100 टक्के खर्च झाला पाहिजे असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
सन 2026-27 च्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देवून पुढील आर्थिक वर्षात मंजूर नियतव्यय शेवटपर्यंत शिल्लक न ठेवता अगोदरच खर्च झाला पाहिजे. सर्व यंत्रणांनी तांत्रिक मंजूरी, प्रशासकीय मंजूरी वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी. सर्व विकासकामे गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजेत. भटक्या प्राण्यांसाठी शेल्टर उभारण्याचे निर्देश महानगरपालिकांना दिले. पावसाळयापूर्वीची कामे सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. नागरिकांची गैरसोय होवू नये. शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत करता येईल. सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. वाहतूक नियोजन, आरोग्य यंत्रणा अर्लट राहिल्या पाहिजेत. धोकादायक इमारतींमधील लोकांसाठी क्लस्टरसाठी सूचना दिल्या आहेत. रेल्वेवरील ताण करण्यासाठी मेट्रोचे जाळे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ट्राफिक कमी होईल, बायपास रस्त्यांचे काम सुरु आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासासाठी भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधा व वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा, आयटी पार्क, एमआयडीसी, आरोग्य व शिक्षण, जिल्हा रुग्णालय, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबींचा त्यांनी आढावा घेवून संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदराजंली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविकात सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील चालू प्रकल्पांची आणि नियोजित कामांची सविस्तर माहिती दिली.
