डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगरातील अनेक छानशा बंगल्यमधील बाग पाहिली तर आपण निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणात आलो आहोत असच वाटत. कोकणासारखेच येथील बहुसंख्य बंगल्यांच्या आवारात आंबे, फणस, चिकू, केळी, नारळ इत्यादीसारखी कोकणात येणारी झाडे लावली गेली आहेत. आंबा, नारळ ही झाडे आपल्याला कोकणासहित सर्वच ठिकाणी पाहण्यास मिळतात.
आता डोंबिवलीतील मिलापनगरमध्ये काही बंगल्यांच्या आवारातील झाडांना फणस लागल्याचे दिसते. मिलापनगरमधील रश्मी विचारे, वसंत छेडा, राजू सुर्वे व वल्लभ आठवले यांच्यासह अनेक रहिवाशांच्या बंगल्यांच्या आवारात फणसांची झाडे फळांनी बहरली असून आता येत्या काही दिवसांतच हे फणस पिकतील. फणसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, हृदयरोगावर नियंत्रण आणि साखर नियंत्रित होते असे अनेक आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत. जून महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमा सणाला या फणसाचे महत्व फार असते. या दरम्यान जागोजागी फणस विकणारे दिसतात. यावेळी मात्र मिलापनगरवासियांना फणस विकत घ्यावे लागणार नाही असे दिसते. जेव्हा हे फणस फळ छोटे, कच्चे असते तेव्हा काहीजण या फणसाची चविष्ट अशी भाजी बनवितात , ज्यांच्या आवारात केळी ची झाडे आहेत ते केळ फुलांची भाजी बनवून त्याचा आस्वाद घेत असतात. फणसाबरोबर आंबे, नारळ, पेरू, चिकू, केळी, पपई, जांभूळ, जाम इत्यादी फळेही मिलापनगरमधील झाडांवर लागल्याचे दिसत असून त्यामुळे पोपट, साळुंकी, भारद्वाज, बुलबुल, वटवट्या , कस्तुर, दयाळ, कोकिळ, नाचण, तांबट, फूलचुख्या इत्यादी पक्षी आणि फूलपाखरे यांचा राबता वाढला आहे.
सध्या अतिशय उकाडा वाढल्याचे दिसत असून आणि एकंदरीत आपल्या येथे पर्यावरणाचा असमतोल वाढत असताना अशी छान छान फळे लागणे आणि त्यांसाठी पक्ष्यांचा वावर वाढणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने एक सुखद घटना म्हटली पाहिजे असे स्थानिक रहिवाशांचे मत आहे
