दिवा : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः दिवा-शीळ रस्ता, भारत गिअर ते पोलीस स्टेशन आणि दिवा ब्रिज ते शिळफाटा या परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत गोडाऊनचे पेव फुटले आहे. २०२२ ते २०२६ या प्रशासकीय राजवटीच्या काळात या अनधिकृत बांधकामांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, यामुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शिवसेना नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
👉महापालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान
दिवा प्रभागात हजारोच्या संख्येने पत्र्याची मोठी गोडाऊन उभी राहिली आहेत. ही बांधकामे करताना महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्यास यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. या गोडाऊनमधून कोणत्या प्रकारचे व्यवसाय चालतात, याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यांना व्यावसायिक 'मालमत्ता कर' भरावा लागतो का याची माहिती पालिका प्रशासनाने अद्याप संबंधित लोकप्रतिनिधींना दिलेली नाही. यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्पन्नाचा हा मोठा स्रोत अनधिकृत धंद्यांमुळे आटला आहे.
👉असुरक्षितता आणि आगीचा धोका
या पत्र्याच्या शेडमध्ये ज्वलनशील पदार्थांची साठवणूक किंवा अनधिकृत कारखाने चालवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनशून्य पद्धतीने बांधलेली ही गोडाऊन आगीच्या घटनांना निमंत्रण देत आहेत.
अग्निशमन दलाला अडथळा: अरुंद रस्ते आणि दाटीवाटीने झालेली ही बांधकामे यामुळे आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचणे कठीण होते.
सुरक्षेचा अभाव: कोणत्याही 'फायर ऑडिट'शिवाय चालणाऱ्या या गोडाऊनमुळे आजूबाजूच्या निवासी क्षेत्रालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
👉स्वच्छ व सुंदर शहराच्या क्रमवारीत घसरणीची भीती
ठाणे शहराने स्वच्छतेच्या बाबतीत ३५ व्या क्रमांकावरून १५ व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. मात्र, दिवा परिसरातील हे अनियंत्रित आणि विद्रुप पत्र्याचे साम्राज्य शहराच्या सौंदर्याला बाधा आणत आहे. जर या अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर शहराच्या क्रमवारीत पुन्हा घसरण होण्याची भीती नगरसेवक बाबाजी पाटील यांनी याआधीच व्यक्त केली आहे.
प्रशासकीय उदासीनता ?
सौ. अर्चना पाटील यांनी १६ मार्च २०२६ रोजी या संदर्भात सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले होते मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
पुढील आव्हाने आणि मागणी
शहराच्या शाश्वत विकासासाठी ही अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त करणे आवश्यक आहे.
१. या गोडाऊनची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात जाहीर करावी.
२. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
३. थकीत मालमत्ता कराची वसुली करून बेकायदेशीर बांधकामांवर त्वरित बुलडोझर चालवावा.
शीळ विभाग व दिवेकरांच्या हितासाठी आणि शहराचा 'स्मार्ट' दर्जा टिकवण्यासाठी महापालिका आयुक्त यावर काय पाऊल उचलतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
" प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा. इतके दिवस चालढकल का केली जाते हेच कळत नाही.या ठिकाणी व्यवसाय करणारे स्थानिक नसून बहुतांश हे बाहेरून आलेले आहेत. त्यात बांगलादेशीही असू शकतात. शहराच्या भविष्यासाठी ही गंभीर बाब असून तात्काळ अनधिकृत व बेकायदा गोडाऊन बाबत पालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना निर्देश द्यावेत अशी आमची मागणी आहे."- अर्चना निलेश पाटील - नगरसेविका, ठाणे महानगर पालिका
" नगरसेविका अर्चना पाटील यांनी जे पत्र दिले आहे त्याबाबत आम्ही संपूर्ण कारवाईबाबतचा अहवाल त्यांना देणार आहोत. गोडाऊन बाबत परमिशन आम्ही देत नसतो. आणि अशा परमिशन दिलेल्या सुद्धा नाहीत. त्यामुळे असे गोडाऊन आढळल्यास आम्हाला संपर्क साधा आम्ही कारवाई करू."- शिवप्रसाद नागरगोजे - सहायक आयुक्त, दिवा प्रभाग समिती
