दक्ष नागरिक संघटना व भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेच्या पुढाकाराने प्रशासनासमोर मांडले वाहतूक कोंडीचे प्रश्न
लवकरच ठोस उपाययोजनांचे आश्वासन
प्रतिनिधी | शिळ फाटा ( ठाणे ) : शिळ फाटा-कल्याण फाटा सर्कल परिसरात दररोज निर्माण होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दक्ष नागरिक संघटना आणि भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना यांच्या पुढाकाराने ठाणे शहराचे अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे तसेच मुंब्रा वाहतूक विभागाचे अधिकारी अतुल अहिरे यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन वाहतूक समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान स्थानिक नगरसेविका वेदिका साहिल पाटील, भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे तालुका प्रमुख बाबुराव मुंडे, साहिल पाटील, सुनील आलिमकर, वैशाली भोसले, रवींद्र पाटील, प्रवीण पावशे, भगवान फौजदार, करण खारपाटील, गिरीश पाटील, ॲड. जितेश पाटील, पत्रकार विनोद वास्कर, शरद पाटील, रमेश राऊत आणि मंगल खारपाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित प्रतिनिधींनी शिळ फाटा-कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे प्रशासनासमोर मांडत, दररोज नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची सविस्तर माहिती दिली. तसेच वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे आणि वाहतूक अधिकारी अतुल अहिरे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
दरम्यान, दक्ष नागरिक संघटनेने यापूर्वीही मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत तब्बल ४० वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या बैठकीनंतर शिळ फाटा-कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नालाही लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

.png)