२ जुलै रोजी प्रमुख विणेकऱ्यांचे हनुमान मंदिरातून प्रस्थान; ७ जुलैला होळी मैदानातून मुख्य दिंडी सोहळा
नवी मुंबई (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी वारीनिमित्त कोपरखैरणे येथील श्री विठ्ठल-रखुमाई सेवा वारकरी मंडळ यांच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिंडी क्रमांक १८८ पायी श्रीक्षेत्र आळंदीकडे रवाना होणार आहे.
मंडळाचे प्रमुख विणेकरी २ जुलै रोजी सकाळी कोपरखैरणे येथील हनुमान मंदिरातून श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान करणार आहेत. त्यानंतर ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नवी मुंबईतील विविध भागांतील वारकरी कोपरखैरणे येथील होळी मैदानातून मुख्य पायी दिंडी सोहळ्यासह श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान करतील.
आळंदी येथे ८ जुलै रोजी सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असून, ९ जुलै रोजी देवाची आळंदी येथून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. या पवित्र वारीत सहभागी होण्यासाठी वारकरी मोठ्या उत्साहात तयारी करत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
ही माहिती कोपरखैरणे येथील ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

