Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महापालिका रणसंग्रामासाठी शिवसेना ठाकरे गट सज्ज; डोंबिवलीत पदाधिकारी मेळावा; अनिल परब यांची संघटना तपासणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संघटन मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार 12 तारखेला डोंबिवलीतील हेरिटेज हॉलमध्ये पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते व विधान परिषदेचे आमदार अनिल परब, उपनेते गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, वैशाली दरेकर, तात्या माने यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला.


या मेळाव्यात अनिल परब यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक तयारीची सविस्तर माहिती घेतली. “येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट दमदार कामगिरी करणार आहे. त्यासाठी आपण आजपासूनच तयारीला लागलो आहोत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि तो अधिक दृढ करण्याचे काम आम्ही करणार आहोत,” असे परब यांनी यावेळी स्पष्ट केले.


कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी अशा मेळाव्यांची आवश्यकता असल्याचे सांगून परब यांनी सांगितले की, “मी इथे येऊन केवळ चर्चा करणार नाही, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येथे झालेल्या बैठकीची सविस्तर माहितीही देणार आहे.”

मनसे आणि ठाकरे गट युतीबाबत पत्रकारांनी विचारले असता परब यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. “सकाळीच मी पत्रकार परिषद घेतली असून त्यात या विषयावर माझे मत मांडले आहे,” असे सांगून त्यांनी चर्चेला फाटा दिला.

दरम्यान, एका अपघातासंदर्भात त्यांनी शोक व्यक्त केला. “तो एक दुर्दैवी अपघात होता. यामध्ये नेमकं काय घडलं ते स्पष्ट होणे आवश्यक आहे. सखोल माहिती आल्यानंतरच योग्य भूमिका मांडता येईल,” असे म्हणत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाने महापालिका निवडणुकांसाठी सुरुवातीपासूनच संघटनात्मक तयारी सुरु केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.यावेळी सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |