13 जण जेरबंद 115 किलो गांजासह पिस्तूल आणि साधनसामुग्री केली हस्तगत
कल्याण : कल्याण पोलीसांनी आंतरराज्य "गांजा" तस्करीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी कल्याणसह सोलापुर, विशाखापटणम् (आंध्रप्रदेश) या ठिकाणांवरून तब्बल १३ आरोपींना ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी, मोटार कार, रिक्षा, दुचाकी वाहने अशा ७० लाखांहून अधिक मुद्देमालासह जेरबंद केले असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे. अंमली पदार्थाविरोधात कल्याण पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतच्या विविध मोठ्या कारवायांपैकी एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.
कल्याण आणि डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलरवर कारवाई करण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाने खडकपाडा पोलिसांच्या सहाय्याने २ ऑगस्ट २०२५ रोजी खडकपाडा पोलीस ठाणे हददीतील आंबिवली रेल्वे स्टेशन फाटकापुढे असलेल्या बनेली रोड परिसरातून गांजा तस्करीप्रकरणी ३ आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी तपास करत असताना पोलीसांना या गांजा तस्करीचे धागेदोरे कल्याण, बदलापूर, सोलापूर, ठाण्यासह आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपर्यंत असल्याची माहिती मिळाली.
त्यादृष्टीने आवश्यक ते पुरावे प्राप्त करून आणि प्राप्त पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त झेंडे यांच्या मार्गदशनाखाली विविध तपासपथक बदलापुर, ठाणे, सोलापुर जिल्हा, विशाखापट्टणम राज्य आंध्रप्रदेश इत्यादी ठिकाणी पाठवुन या पथकांनी 13 आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहितीही अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी १) बाबर उरमान शेख, वय २७ वर्षे, २) गुफरान हनान शेख, वय २९ वर्षे, ३) सुनिल मोहन राठोड, यय २५ वर्षे, ४) आझाद अब्दुल शेख वय ५५ वर्षे, ५) रेश्मा अल्लावुददीन शेख वय ४४ वर्षे, ६) शुभम उर्फ सोन्या शरद भंडारी, वय २६ वर्षे, (७) सोनु हबीब सय्यद, वय २४ वर्षे, ८) आसिफ अहमद अब्दुल शेख, वय २५ वर्षे,९) प्रथमेश हरीदास नलवडे, वय २३ वर्षे, १०) रितेश पांडुरंग गायकवाड, वय २१ वर्षे,११) अंबादास नवनाथ खामकर, वय २५ वर्षे,१२) आकाश बाळु भिताडे, वय २८ वर्षे,१३) योगेश दत्तात्रय जोथ, वय ३४ वर्षे या आरोपींना अटक केली आहे.
