Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईनरित्या जमा

विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन - राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे, दि.१९ : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्यपाल यांचे उप सचिव राममूर्ती आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, राज्यात काही शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करुन स्वत:च नवनवीन शोध लावत आहेत. एकप्रकारे ते शास्त्रज्ञाचे काम करीत आहेत. त्यांचा शोध इतरांना मार्गदर्शक आहे. अति प्रमाणात रसायने फवारल्याने रोपांचे नुकसान होते. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले द्रव्य अग्नीअस्त्र व निमास्त्राचा आलटून- पालटून फवारणी केल्यास शेतामध्ये कधीही निमॅटोडची समस्या राहणार नाही.

राज्यपाल देवव्रत यांनी शेतीविषयी आपले अनुभव कथन करून पिकांचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीविषयी माहिती दिली.

यावेळी आयुक्त श्री.मांढरे यांनी ‘पी एम किसान सन्मान निधी’ योजनेसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ व्या हप्त्यापोटी १ हजार ८०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत ३६ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या मंगेश भास्कर, दत्तात्रय निगडे, रामदास लांडगे, अनिल पायगुडे व लहू फाले या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतील अनुभव सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |