कल्याण ग्रामीणमधील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल..
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी निळजे (Nilje) येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन दिले.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील ७७ गावांच्या आरोग्यास यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता, तातडीच्या उपचारांसाठी डोंबिवली किंवा कल्याण येथील महानगरपालिका रुग्णालयावर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर सुसज्ज रुग्णालयाची गरज ओळखून कल्याण ग्रामीण मतदार संघातील निळजे येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे, या अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना आ. राजेश मोरे यांनी निवेदन दिले .
सदर मागणीचा आ. राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून निळजे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास कल्याण ग्रामीणमधील २७ गावे, श्री मलंगगड परिसरातील ३६ गावे तसेच नवी मुंबई समाविष्ठ झालेली १४ गावे या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्वरित व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकतील, हे निवेदनामध्ये ठळकपणे मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
सद्यस्थितीत निळजे येथील आरोग्य केंद्राची दुरावस्था व अपुरी सुविधा यामुळे आरोग्य कर्मचारी नागरिकांना अपेक्षित सेवा देऊ शकत नाहीत, ही गंभीर बाबही मांडण्यात आली. निळजे येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास सर्व नमूद गावांतील नागरिकांना तातडीची उपचार सेवा स्थानिक पातळीवरच मिळेल, ज्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतील. आजच्या परिस्थितीत निळजे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय किंवा कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय येथे जावे लागते. ही दोन्ही रुग्णालये लांब अंतरावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत वेळेअभावी रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो, तसेच मधल्या काळात जीवितहानी होण्याची शक्यता वाढते. दरम्यान, निळजे परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प उभे राहत असून वेगाने शहरीकरण होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अल्पउत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास असून ते सरकारी आरोग्य सेवांवर अवलंबून आहेत. मात्र सध्याच्या आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारासाठी डोंबिवली किंवा कल्याण येथील महानगरपालिका रुग्णालयांचा लांब पल्ला गाठावा लागतो, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. निळजे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील नागरिकांना सर्व उपचार, आपत्कालीन सेवा, मातृत्व सेवा व विविध वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील आणि परिसरातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल.
कल्याण ग्रामीण मधील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देणे हे माझे कर्तव्य असून, त्यासाठी हा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे आ. राजेश मोरे यांनी सांगितले .
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून शासनाने यास लवकरात लवकर मान्यता द्यावी, अशी विनंती आ. राजेश मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
