ठाणे : ठाणे महानगरपालिका अर्थसंकल्पीय महासभेमध्ये भाजप नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या प्रभाग क्र. २९ मधील अनेक विषयांवर भाष्य करताना मंजूर असलेले अनेक विकास आरखडांमधील रस्ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाहीत.
कल्याण ग्रामीण विधानसभेतील पडले गाव ते खार्डी गाव (तावशीचा रस्ता) याचे उदाहरण देताना त्यांनी स्वतः कॉलेजला ये-जा करण्यासाठी रस्त्याचा वापर करत होती. परंतु १० वर्षे मंजूर होऊन सुद्धा तरी तो रस्ता अपूर्णच आहे, याची खंत व्यक्त करत आता नगरसेविका झाल्याने, आता तरी तो रस्ता पूर्णत्वास नेण्याची मागणी ठामपा प्रशासनास केली.शिळ, डायघर, देसाई, पडले, खिडकाळी, दिवा, फडकेपाडा, लोढा,काटई, डावले, डोंबिवली, १४ गावे या सर्वांना हा रस्त्याचा उपयोग होतो. जेव्हा वाहतूक कोंडी होते त्यावेळी हा मार्ग सोईस्कर पडतो. हा रस्ता होणे खूप गरजेचे आहे. या रस्त्यामुळे वाहन चालकांचा वेळ आणि वाहन चालण्यासाठी लागणारा पेट्रोल, डिझेल, सीएनजी, या सर्व इंधनाची बचत होणार आहे. हा रस्ता झाल्यास वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
विकास आरखाड्यामधील रस्ते पूर्ण झाल्यास नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. त्याच बरोबर दिवा-साबे गावात जाण्यासाठी, शिळ-दिवा मुख्य रस्ता, -शिळ- कल्याण फाटा जाण्यासाठी रस्ता, प्रशांत नगर-साबेगाव असा रस्ता तयार करून साबे गावासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी केली.
प्रभागातील पाण्याची टंचाई लक्षात घेत तसेच अनेक ठिकाणी जलकुंभ उभे करून जलवाहिनीचे जाळे निर्माण करून नागरिकांना पाणीटंचाईतून मुक्त करण्याची मागणी केली. शिक्षण विषयावर भर देत अनेक शाळांना मुलभूत सोयीसुविधा नसल्याचे निदर्शनास आणले.
तसेच अनेक शाळेत विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मशीनची उपलब्धता करून देण्याची तसेच डायघर, खार्डी गावतील शाळा इयत्ता दहावीपर्यंत करण्यची मागणी केली. महिला सुरक्षेवर भर देत गावोगावी विद्युत पथदिवे त्याच बरोबर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याची मागणी केली.
