कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे दिले निर्देश, एका अधिकाऱ्याची बदली तर एका अधिकाऱ्याला निलंबनाची नोटीस
·झाडांचे शास्त्रोक्त पध्दतीने ऑडिट करा
ठाणे (06) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट देवून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर आपत्तीच्या काळात कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली तर एका अधिकाऱ्याला निलंबनाची नोटीस बजावली.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, उपनगरअभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी, राजेश मोरे, विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले आदी उपस्थित होते.
ताशी 80 ते 90 पेक्षा वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार अतिवृष्टीमुळे शहरात झाडे व फांद्या पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली. या भेटीत त्यांनी तातडीने सर्व झाडांचे शास्त्रोक्त पध्दतीने ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. संबंधित झाडांची शेवटची छाटणी (ट्रिमिंग) कधी करण्यात आली होती, झाडांची स्थिती काय होती आणि कोणत्या कारणांमुळे ती पडली याचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरात पडलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने हटविण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या हायड्रा, लिफ्टिंग मशीन आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचेही निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. तसेच मनुष्यबळ कमी पडत असल्यास तातडीने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या.
भविष्यात झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, या प्रक्रियेत वृक्षतज्ज्ञ, उद्यान क्षेत्रातील जाणकार, स्वयंसेवी संस्था तसेच इतर तज्ज्ञांना सहभागी करुन घ्यावे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे किंवा इतर विकासकामांमुळे झाडांच्या मुळांपर्यंत हवा व पाणी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे झाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ती वादळी वाऱ्यात कोसळण्याची शक्यता वाढत असल्याने या बाबींचाही अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देताना आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आर्थिक तरतूद तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. तसेच केवळ आपत्ती व्यवस्थापन विभाग नव्हे तर इतर विभागांतील अधिकाऱ्यांनाही गरजेनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे शहरातील सखल भागात 84 ठिकाणी पंप बसविण्यात आले असून त्या पंपांचे नियंत्रण आणि देखरेख आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सातत्याने करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता भासते त्या ठिकाणी तातडीने पंप कार्यान्वित केल्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कामातील हयगय खपवून घेतली जाणार नाही
पावसाळ्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत संबंधित अधिकारी, वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
वृक्ष पडून जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करा
ठाणे शहरात वृक्ष अंगावर पडून जखमी झालेल्या नागरिकांवर तातडीने उपचार होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. नागरिकांच्या जीवितास कोणतीही हानी होऊ नये, याला सर्वोच्च प्राधान्य द्या, मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करता येते, मात्र एखादा जीव गमावल्यास त्या कुटुंबाचे होणारे दुःख भरून काढता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन ठाण्यात एकही नागरिकाचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्या, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. .
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा धोका अद्याप कायम असल्याने महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांनी 24 तास सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

