कल्याण : सखोल पुर्नरिक्षण मोहिमेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक -समन्वयातून आणि सहकार्यातून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज केले. कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांचेसोबत विशेष सखोल पुर्नरिक्षण (एस.आय.आर.) मोहिमेसंदर्भात आयोजिलेल्या बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधिताना त्यांनी हे प्रतिपादन केले, यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे,प्रांत अधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हाधिकारी वरुण सहारे ,उपआयुक्त रामदास कोकरे, तहसीलदार विकास गारुडकर आणि कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील चारही मतदार संघाचे (138, 142, 143 व 144) मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने मतदार याद्या पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला असून, याच अनुषंगाने या मोहिमेसाठी आवश्यक असणारे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA- राजकीय पक्षाचे प्रतिनिधी) नेमण्यासाठी गतआठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील मतदार संघात नेमण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांना आज जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या मोहिमेचे महत्व विषद करीत स्वत: मार्गदर्शन केले.
निवडणूक आयोगाची ही महत्वाची मोहिम असून, प्रत्येक मतदाराने मतदार यादीत आपले नाव सुयोग्यरित्या समाविष्ट होईल याची खातरजमा करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत केले.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जावून मतदारांकडून Enumeration Form (गणना प्रपत्र) भरुन घेतला. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष सखोल पुर्नरिक्षण (एस.आय.आर.) मोहिमेत समक्ष सहभाग घेवून, निवडणूक आयोगाच्या या मोहिमेचे महत्व जनमानसात अधोरेखित केले आहे.

