मुंबई, दि. २४:- मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ. यास्मिन शेख यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषा, भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासासाठी व संवर्धनासाठी समर्पित केले. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ३४ वर्षे अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आस्था आणि प्रमाण भाषेची जाण निर्माण केली. मुंबईतील एस.आय.ई.एस. महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’ मध्ये आयएएसच्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्राचे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनात त्यांनी सात वर्षे योगदान दिले. ‘कार्यात्मक व्याकरण’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने डॉ. अशोक केळकर सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. ‘भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,’ हा विचार डॉ. यास्मिन शेख यांनी आपल्या कार्यातून सातत्याने समाजासमोर ठेवला. मराठी बोलताना परकीय शब्दांचा अनावश्यक वापर टाळावा आणि ललित तसेच वैचारिक लेखनात प्रमाण भाषेचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. डॉ. यास्मिन शेख यांचा जीवनप्रवास हा सामाजिक सलोखा, वैचारिक समृद्धी आणि मराठी भाषेवरील निष्ठेचा अनोखा संगम होता. शतकभराचा समृद्ध जीवनप्रवास आणि मराठी भाषेसाठी केलेले त्यांचे अविरत कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी भाषेच्या क्षेत्रातील एक समर्पित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.

