ठाणे ( प्रतिनिधी ) : कोविड काळात बंद करण्यात आलेली दिवा ते भारत गिअर कंपनी मार्गावरील TMT बससेवा तीन वर्षे झाली तरी सुरु झालेली नाही. यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. याची महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि ठाणे परिवहन व्यवस्थापक यांनी तात्काळ दखल घेऊन बससेवा सुरु करावी, अशी मागणी होत आहे.
ही बससेवा पूर्वी दिवा स्टेशन - फडकेपाडा - तंत्रनिकेतन कॉलेज - डावलेगाव - खार्डी - भारत गिअर कंपनी या मार्गावर नियमित सुरु होती. कोविडमध्ये ती बंद करण्यात आली. पण आता जनजीवन पूर्ववत झाले तरी ही सेवा बंदच आहे.
सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना
तंत्रनिकेतन कॉलेजच्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना दिवा स्टेशनपासून ३.५ किलोमीटरचा रस्ता दररोज पायी किंवा जास्त पैसे देऊन रिक्षाने जावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
ग्रामस्थ आणि कामगारांचे हाल
डावलेगाव,फडकेपाडा, खार्डी, आणि भारत गिअर्स कंपनीत काम करणाऱ्या हजारो कामगारांना, महिला आणि वृद्ध ग्रामस्थांना थेट बस नसल्याने रोज ६० ते ८० रुपये जादा भाडे द्यावे लागत आहे.
समाजसेवक विनोद वास्कर यांनी २०२२ पासून या मार्गासाठी TMT प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. ५ मे २०२६ रोजी त्यांनी पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.
तरी या मार्गावरील ५० हजार नागरिकांचा विचार करून ठाणे परिवहन विभागाने दिवा-तंत्रनिकेतन-डावले-भारत गिअर मार्गावरील बससेवा लवकरात लवकर पुनश्च सुरु करावी, अशी मागणी दिवा- फडके पाडा खार्डी-डावले परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.

