डोंबिवली ( शंकर जाधव ) महावितरणकडून मागेल त्याला सौरपंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज, अभय आदी ग्राहक हिताच्या विविध योजना सुरू आहेत. ग्राहक कल्याणाच्या या योजनांमध्ये अधिकाधिक ग्राहक सहभागी व्हावेत, यादृष्टीने काम करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (भाप्रसे) यांनी दिले.
पालघर जिल्ह्यांतर्गत महावितरणच्या वसई आणि पालघर मंडल कार्यालयांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी व गुरुवारी (२३ जानेवारी) आयोजित बैठकांमध्ये जगदाळे बोलत होते. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा, वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे यांची या बैठकांना प्रमुख उपस्थिती होती. जगदाळे म्हणाले, प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ग्राहक विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्यासोबतच अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळवू शकतात. या योजनेत स्वत:हून ग्राहक सहभागाचे लक्ष्य निर्धारित करून ते साध्य करण्यासाठी काम करा. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून शेतीपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठ्याची हमी असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. सौरग्राम आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना स्वंयस्फुर्तीने गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून चालु वीजबिलासह थकबाकी वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यात नियमितता ठेवा. ग्राहकांना विहित कालावधीत, सहज आणि शक्य तितक्या सोप्या पध्दतीने तत्काळ नवीन वीज जोडण्या द्याव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखाद्या जागेचा मालकी हक्क बदलला तरीही त्या जागेवरील वीजबिल थकबाकी अबाधित राहते. याचा आधार घेऊन कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकी वसुल करावी. या ग्राहकांना अभय योजनेच्या लाभातून मुख्य प्रवाहात आणावे. अधिक वीजगळती असलेल्या वीज वाहिन्यांवर नियमितपणे मोहिमा राबवून गळती कमी करण्याच्या सूचना सहव्यवस्थापकीय संचालक जगदाळे यांनी दिल्या.
पालघर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते व उपकार्यकारी अभियंते या बैठकांना उपस्थित होते.
()