कल्याण ( शंकर जाधव ) : माणूसकीची भिंत आणि निरुपयोगी वस्तु संकलन, या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सहयोग सामाजिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ टाइगर यांच्या संयुक्त प्रयत्नातून "माणूसकीची भिंत" व "निरुपयोगी वस्तु संकलन" या उपक्रमांचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे शुभहस्ते संपन्न झाले, त्यावेळी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केले. तसेच महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे माणुसकीची भिंत उभारावी अश्या सुचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी 5/ड प्रभागाचे सहा.आयुक्त उमेश यमगर, 4/जे प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले, रोटरी क्लब ऑफ टाइगरचे अध्यक्ष भुषण कोठावदे, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, जाणीव सामाजिक संस्थेच्या अनिता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांना त्यांच्या वापरात नसलेल्या वस्तु समाजातील गरजूंपर्यत पोहचविण्याची एक सामाजिक चळवळ सुरु झाली आहे. नागरीकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा सहयोग सामाजिक संस्थेचे संचालक विजय भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
