ठाणे : राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते' - विक्रांत चव्हाण ठाणे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपहार्य विधान केले आहे. राहुल गांधी हे `रिस्पेक्टेड नेते' असून ठाणे काँग्रेसने आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार परिषद घेत निषेध केला.
पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शिरीष घरत, सुभाष ठोंबरे, उमेश कांबळे, नुर्शिद शेख, अरुण राजगुरू, प्रकाश मयेकर, हरिश्चंद्र खरात, अच्युत नलावडे, बाळा डकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल गांधी रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. ज्यांना महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यात येत नाही ते राहुल गांधींबद्दल वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्य पाचव्या नंबरवर होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भोंदूगिरी आणि स्त्रियांवर अत्याचारामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. लवकरच कोणीही तरी नवा चेहरा आपल्या समोर येईल. देवेंद्र फडणवीस सगळ्या बाबतीत बॅकफूट वर आले आहेत. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाहीत, लॉ अँड ऑर्डर विस्कळीत झाले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यांत काँग्रेस किंवा आघाडीचे सरकार आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तितकी उंची नसल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.
--

