अतिमुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींसह सर्व माध्यमांच्या शाळा राहणार बंद
ठाणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ६ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच राष्ट्रीय फ्लॅश फ्लड गाईडन्स बुलेटिनमध्येही सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार , ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, नद्या-नाले तुडुंब भरणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींकडून प्राप्त झालेल्या अहवालांचा विचार करून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी राहणार आहे. हा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ आणि शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित परिपत्रकानुसार जारी करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

