डोंबिवली ( शंकर जाधव ) : डी. वाय. पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, नवी मुंबईच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे, Pharma Vision यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त "Narco-Terrorism and National Youth: Strengthening Democratic Institutions for a Secure India" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रिषिहूड विद्यापीठाचे प्रोग्राम मॅनेजर (Instructional Delivery) आलोक विरेंद्र तिवारी यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्याख्यानात तिवारी यांनी भारताच्या भौगोलिक स्थानामुळे देश Golden Crescent आणि Golden Triangle या जगातील प्रमुख अमली पदार्थ तस्करीच्या मार्गांच्या दरम्यान असल्याने भारतासमोरील आव्हाने अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नार्को-टेररिझम हा केवळ अमली पदार्थांचा प्रश्न नसून दहशतवादाला आर्थिक बळ पुरविणारे राष्ट्रीय सुरक्षेवरील मोठे संकट असल्याचे सांगितले. तसेच कृत्रिम (Synthetic) ड्रग्स, डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी आणि ड्रोनद्वारे होणारी तस्करी ही नव्या पिढीसमोरील गंभीर आव्हाने असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
लोकशाही संस्था, न्यायव्यवस्था, संसद, सुरक्षा यंत्रणा, माध्यमे आणि विद्यापीठे यांनी समन्वयाने काम केल्यासच या धोक्याला प्रभावीपणे तोंड देता येईल, असे त्यांनी नमूद केले. युवकांनी व्यसनमुक्ती, जनजागृती, डिजिटल साक्षरता आणि जबाबदार नागरिकत्वाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

