दिवा : प्रतिनिधी - दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
दिवा परिसरातील संबंधित जलवाहिनीवरील ५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आणि त्यावरील ५०० मि.मी. व्यासाचा कॉल्व्ह नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात विभागाकडे प्राप्त होत आहेत.
नादुरुस्त कॉल्व्हची दुरुस्ती/बदलणी करणे गरजेचे असल्याने मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
निळजे येथून महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. मात्र, त्यानंतर पुढील काही दिवस परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भातील माहिती ठाणे महानगरपालिकेचे उप नगर अभियंता विनोद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

