नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर -१९ येथील श्री हनुमान मंदिरात श्रावण महिन्यातील पवित्र अश्या मानल्या जाणाऱ्या श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त कोपरखैरणे ग्रामस्थातर्फे , ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून " गुरुवर्य - ह.भ.प.वै.अदितवार महाराज म्हात्रे यांच्या प्रेरणेने येत्या २९ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने किर्तन, प्रवचन, इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.दररोज पहाटे ५ ते ६ काकडा, सकाळी ८ ते १२ वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण, संध्या.५ ते ६ प्रवचन, संध्या.६ ते ७ वा.सुश्राव्य असे हरिपाठ होणार आहे.रात्री ९ते ११ या वेळेत नामांकित अश्या किर्तनकारांची किर्तन होणार आहेत.ह.भ.प.श्री.गणेश महाराज पुलकुंठवार ( भिवंडी ) यांचे २९ आॅगस्ट या सप्ताहाच्या प्रथम दिवशी किर्तन होणार आहे.तसेच अन्य दिवशी किर्तनकार - ह.भ.प विशाल महाराज फापाले ( कोपरखैरणे ),ह.भ.प.परमेश्वर महाराज अध्यापक - जोग महाराज ( संस्था देवाची आळंदी ),ह.भ.प.अक्षय महाराज भोसले ( पुणे ),ह.भ.प दिनेश महाराज माने ( लातुर ),ह.भ.प.सोपान महाराज म्हात्रे ( कोपरखैरणे), श्री कृष्ण जन्माचे किर्तन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज (बोगिर ) असुन यांचे किर्तन होणार आहे.तसेच काल्याचे किर्तन ह.भ.प ज्ञानराज महाराज म्हात्रे (कोपरखैरणे ) हे सादर करणार आहेत.
या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या करता गेल्या ३५ वर्षांपासून कोपरखैरणे गावचे माजी नगरसेवक कै.श्री.अनंत शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती.कल्पना अनंत पाटील आणी सौ.हर्षदा शिरिष वेटा यांच्या कडून अखंडीत सुरू असलेल्या ह्या अखंड हरिनाम सप्ताह करता दररोजच्या दुपारच्या जेवणाची -अन्नदानाची सेवा अखंडित अबादीत सुरू आहे.तसेच कोपरखैरणे ग्रामस्थांच्या वतीने दररोज सकाळी अल्पोपहार आणी रात्री ची अन्नदानाच्या पंगती प्रत्येक दिवशी नेमलेल्या व्यक्तींच्या निवास स्थानी पंगत असते.
अखंड हरिनाम सप्ताहा करता गावातील १४ कुटुंबातीयातील प्रत्येक दिवशी २ कुटुंब उपस्थित राहून आपली दिवसभराची सेवा करत असतात.ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या ६१ वर्षांची परंपरा सुरू आहे.प्रत्येक दिवशी किर्तनकारांन साठी गावातील ग्रामस्थांच्या वतीने हार - मानधन ही देण्यात येत असतो.श्री कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी जन्मानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असतो.
तसेच शेवटच्या दिवशी काल्याच्या किर्तना नंतर कार्यक्रम स्थळी " मानाच्या दहीहंडी" च्या लिलावाला गावातील ग्रामस्थांच्या वतीने बोलीला सुरुवात होत असते.अशी माहिती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली

